अचूक हवामान अंदाजासाठी भारत अंदाज प्रणाली   

दत्तात्रय जाधव 

भारताने जगातील पहिली अल्ट्रा-हाय रिझोल्युशन हवामान अंदाज प्रणाली विकसित केली आहे. ‘भारत अंदाज प्रणाली’ असे तिचे नाव असून, या प्रणालीमुळे अवघ्या ६ किलोमीटरपर्यंतचा हवामानाचा अचूक अंदाज लावता येणार आहे. अमेरिका, युरोप आणि ब्रिटनमधील हवामान प्रणालींपेक्षा हे प्रगत तंत्रज्ञान आहे. 

काय आहे ही प्रणाली? 

ही एक अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणाली आहे. देश, राज्यपातळीवरील नव्हे तर स्थानिक पातळीवर देखील हवामान कसे असेल, याचा अधिक अचूक अंदाज त्याद्वारे वर्तवण्यात येतो. भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित पुणे येथील भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेने ही प्रणाली विकसित केली आहे. हवामान विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापनातील भारताच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत हा एक मैलाचा दगड आहे. 

कसे काम करते?

भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेत असलेल्या ’अर्का’ आणि ’अरुणिका’ या उच्च-कार्यक्षमता असलेल्या संगणकीय प्रणाली आणि दिल्ली येथील राष्ट्रीय मध्यम श्रेणी हवामान अंदाज केंद्रामुळे सुधारित अंदाज प्रणाली शक्य झाली आहे. या आधी ’प्रत्युष’ नावाच्या संगणकीय प्रणालीला सर्व माहिती एकत्र करून, त्यावर प्रक्रिया करून हवामान अंदाज मांडण्यासाठी साधारण दहा तास लागायचे; पण अर्का ही संगणकीय प्रणाली हेच काम चार तासांत करू शकते. या प्रणालीमुळे हवामान अंदाज ६४ टक्के अधिक अचूक होणार असून, पूर, चक्रीवादळे, उष्णतेच्या लाटा यासारख्या टोकाच्या हवामान घटनांचे ३० टक्के अधिक अचूक भाकीत करता येईल.

उद्दिष्टे कोणती? 

भारताच्या हवामान अंदाज क्षमतांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी भारत अंदाज प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. कृषी नियोजन आणि अन्न सुरक्षेला पाठिंबा देण्यासाठी मान्सूनचा अंदाज वाढवणे, पूर, चक्रीवादळे आणि अतिवृष्टीसाठी वेळेवर आणि स्थानिक पातळीवर सूचना देऊन आपत्ती सज्जता वाढवणे. अचूक हवामान डेटासह विमान वाहतूक आणि वाहतूक सुरक्षितता सुधारणे.

फायदे काय? 

या प्रणालीमुळे चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि पूर यासारख्या संकटांचा अचूक अंदाज मांडता येईल, त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करून जीवितहानी टाळता येईल. शेतीसाठी अधिक अचूक हवामान अंदाज वर्तवण्यात आल्याने पिकांचे नुकसान टाळण्यास मदत मिळेल. सर्वसामान्य नागरिकांनाही आपल्या दैनंदिन आयुष्यात हवामानाच्या अचूक अंदाजाचा उपयोग करता येईल.आतापर्यंत चार ते पाच गावांचा एकत्रित अंदाज मिळत होता; पण आता गावपातळीवरचा अंदाजही मिळणार आहे.

२०२२ पासून चाचण्या 

२०१७ मध्ये या प्रणालीच्या विकसनाचे काम हाती घेण्यात आले. २०२२ मध्ये ही प्रणाली सादर करण्यात आली. तेव्हापासून तीन वर्षे त्याच्या चाचण्या सुरू होत्या. या चाचण्यांमधून  मान्सून, गारपीट, अतिवृष्टी तसेच दोन तासांचा हवामान अंदाज देण्याची यंत्रणेची अचूकता ३० ते ६७ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. 

जागतिक पातळीवर झेप

हवामानातील अस्थिरता वाढत असताना भारत अंदाज प्रणालीने अचूक हवामान अंदाजात भारताला जागतिक आघाडीवर नेले आहे. ही केवळ तांत्रिक प्रणाली नाही, तर ती भारताच्या संशोधनक्षमतेचा ठसठशीत पुरावा आहे. हवामानाच्या लहरीपणाचा सामना करण्यासाठी ही प्रणाली भविष्यातील नवा आशावाद घेऊन आली आहे. ही प्रणाली केवळ भारतापुरतीच मर्यादित नाही तर ती संपूर्ण उष्ण कटिबंधीय भाग ३० अंश दक्षिण ते ३० अंश उत्तर अक्षांशांपर्यंत कव्हर करते. त्यामुळे जगभरातील देशांसाठीही ती महत्त्वाची ठरू शकते. 

वैशिष्ट्ये काय? 

यापूर्वीची हवामान प्रणाली १२ किलोमीटरच्या क्षेत्रातला अंदाज वर्तवू शकत होती; पण हाय रिझोल्युशन असणारी ही नवीन प्रणाली सहा किलोमीटरच्या क्षेत्रापर्यंतचा हवामानाचा अंदाज अधिक अचूकपणे वर्तवणार आहे. अगदी लहान भागांमध्ये हवामानात होणारे बदलही यामुळे अधिक स्पष्टपणे समजू शकतील. स्थानिक पातळीवर पंचायत किंवा काही गावांसाठीचा हवामानाचा अंदाजही त्यामुळे वर्तवता येईल. देशभरातल्या ४० डॉप्लर रडारकडून मिळणारा डेटा या प्रणालीसाठी वापरला जाईल. रडारची ही संख्या हळूहळू वाढवत १०० पर्यंत नेण्याचीही हवामान विभागाची योजना आहे.                
 

Related Articles